Sunday, November 20, 2022

गर्भसंस्कार म्हणजे काय ?


बुद्धिमान, आरोग्यसंपन्न व चारित्र्यवान संततीसाठी गर्भवती स्त्रीने स्वीकारायची सुसंस्कारीत आचारपद्धती


आईच्या पोटामध्ये गर्भ वाढत असल्यामुळे तिच्या आचार-विचारांचा, आहार-विहारांचा समजुतीचा आणि स्वभावाचा सुद्धा परिणाम गर्भावर होत असतो. बाहेरचे जग तो स्वतःच्या डोळ्यांनी बघू शकत नाही. त्यामुळे त्याला आईकडून येणाऱ्या संदेशावर सर्वस्वी अवलंबून रहावे लागते. हे संदेश 'हार्मोन्स'च्या स्वरूपात असतात. (केमिकल सिग्नल्स असतात म्हणून आईला बाह्य जग कसे वाटते हे महत्त्वाचे असते. ते जग आनंदी आहे का कंटाळवाणे आहे, ते सुष्ट आहे की दृष्ट आहे हे तिला जसे वाटत असते तसे ते अप्रत्यक्षरित्या गर्भापर्यंत पोहोचत असते. हा जो अनुभव गर्भाला आईमार्फत मिळतो.त्याप्रमाणे तो स्वतःत बदल करत असतो. गर्भाला कळते, ऐकू येते याबाबत आता नवनवीन पुरावे हाती येऊ लागले आहेत.गर्भधारणेपासून पहिल्या काही महिन्याच्या काळामध्ये ज्ञानेंद्रिये कशी विकसित होतात ती ज्ञानग्रहण कसे करतात याबद्दलच्या संशोधनात रोज नवीन भर पडत आहे.मूल गर्भामध्ये असतानाच त्याला ऐकू येण्याची क्षमता असणे हा त्याच्या विकासाचा महत्त्वाचा टप्पा आहे या क्षमतेमुळे गर्भाचा बाह्य जगाशी संबंध जोडला जातो. जन्मानंतर पालक मुलांच्या शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकासासाठी प्रचंड वेळ, पैसा व ऊर्जा खर्च करतात. मेंदू पेशींपैकी सुमारे ६०% पेक्षा जास्त मेंदूपेशी या गर्भावस्थेत तयार होतात. त्यामुळे गर्भिणीने या काळात 'गर्भसंस्कार' ( बुद्धिमान, आरोग्यसंपन्न व चारित्र्यवान संततीसाठी स्वीकारायची सुसंस्कारीत आचार पद्धती) या कार्यक्रमाचे पालन केले तर निश्चितच अप्रतिम मूल जन्मास येईल. तर मग वाट कसली पाहताय? चला आत्ताच सुरुवात करूया.

 



गर्भसंस्कार यात गर्भिणीकडून खालील गोष्टी करवून घेतल्या जातात.

 

1) प्राणायाम :- गर्भावस्थेत स्त्रीच्या शरीरात प्राणवायूची आवश्यकता जवळ जवळ दीडपटीने वाढलेली असते प्राणवायूचा पुरवठा पुरेसा व योग्य प्रमाणात होऊन गर्भाची वाढ तर चांगली होतेच शिवाय गर्भवतीला थकवाही कमी जाणवतो. चिडचिड, नैराश्य, अनुत्साह वगैरे भावना दूर होऊन, मन शांत होण्यास मदत होते. मळमळ, उलटीचा त्रास कमी होतो.


2) गर्भिणीयोगा- काही विशिष्ट अासने व strectches यामुळे बाळाची स्वास्थ्यपूर्ण वाढ होते. गर्भिणी चे शरीर लवचिक व बांधेसूद राहते. पाठ, कंबर दुखणे हे त्रास कमी होतात. स्नायूंची ताकद वाढते व स्नायूंचा रक्तपुरवठा वाढतो.


3) नैसर्गिक व सुलभ प्रसूती- नियमित प्राणायाम व योगा केल्यामुळे तसेच आयुर्वेदोक्त मात्राबस्ती, योनी पिचू, स्नेहन, मासानुमासिक योग यामुळे नैसर्गिक व सुलभ प्रसूती होण्यासाठी मदत होते. शिवाय प्रसूतीनंतर होणारी मुळव्याध, गुद्कर्तिका, मलबद्धता, वायूनिर्मिती या त्रासाला आळा बसतो.


4) समुपदेशन- गर्भसंस्काराचे महत्व व गरज समजावणे, गर्भावर कशाचा चांगला तर कशाचा वाईट परिणाम होतो याबद्दल जागरूकता निर्माण करणे, गर्भिणीला आहाराबद्दल माहिती देणे.


5) गर्भसंवाद- गर्भाचे अस्तित्व मातेबरोबरच घरातील इतरांना किती आनंदाची बाब आहे, त्याच्या आगमनाने घरात किती उत्साह संचारला आहे असा गर्भाशी संवाद साधावा. विशिष्ट प्रार्थना कराव्यात.


6) गर्भसंगीत- मन व संगीत यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. संगीताचा पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीवर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम होतो. संगीताचा अतिशय चांगला परिणाम गर्भावर होतो. संगीत कळण्यासाठी भाषेची मर्यादा नाही म्हणजे भाषा कळण्याअगोदर संगीत कळू शकते. गर्भसंस्कार, गर्भसंगीत, शास्त्रीय संगीत, मंत्र इ. संगीत नियमित ऐकल्याने गर्भाची सृजनशीलता, कल्पनाशक्ती, शब्द आठवण्याची क्षमता वाढते.


7) योगनिद्रा, ओमकार गुंजन, व ज्योतीध्यान- जन्माच्या वेळी बाळाचे वजन जेवढे चांगले असेल तेवढी पुढील आयुष्यात त्याची प्रकृती चांगली राहील. गर्भिणीच्या मनातील भीती, ताणतणाव, चिंता, मानसिक अस्वस्थता याचा परिणाम गर्भाच्या वाढीवर, वजनावर व मेंदूवर होतो. गर्भिणी आनंदी, उत्साही व शांत राहिल्यास गर्भाची वाढ उत्तम रीतीने होईल. योगनिद्रा यामुळे ताणतणाव, चिंता, भीती दूर होऊन शरीराचे व मनाचे संपूर्ण शिथिलीकरण साधल्या जाते. ज्योतीध्यान हा ध्यानाचा अतिशय सोपा प्रकार असून त्यामुळे आत्मिक (    ) होऊन मन प्रसन्न व शांत होते. ओमकार गुंजनाने गर्भावर ओमकाराचा संस्कार तर होईलच शिवाय गर्भस्थ शिशूच्या बौद्धिक संवर्धनाला मदत करणारी प्रक्रिया म्हणजे ओंकाराचा जप. या ओंकाराची कंपने शिशुच्या मेंदूच्या वाढीला उपकारक ठरतात. यावेळी होणारे दीर्घश्वसनही मातेच्या श्वसनेंद्रियांची क्षमता वाढवतात.


निवडक साहित्य गर्भिणीला वाचनासाठी दिले जाते. वाचनाचा अतिशय खोलवर परिणाम गर्भावर होतो.


प्रसुती पश्चात

* पारंपारिक भारतीय आहार, गरम पाणी, अभ्यंग, आईचे दूध यांचे महत्व समजावून सांगणे.


* शरीराचा पूर्ववत् आकार प्राप्त व्हावा यासाठी तसेच प्रसूतीनंतर सुटणारे पोट, वाढणारे शरीर, स्तनशैथिल्य यावर विशिष्ट अासने.


* पुरेशा प्रमाणात दुग्धनिर्मिती व्हावी तसेच वजन आटोक्यात राहावे यासाठी आयुर्वेदीय औषधी कल्प.


बाळासाठी- बाळाची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी सुवर्णकल्प, आयुर्वेदीय तैलाने अभ्यंग केल्याने बाळाच्या अवयवांची वाढ व्यवस्थित होते. बाळ उत्साही व आनंदी राहून त्याची रडण्याची प्रवृत्ती कमी होते. शांत झोप लागते. त्वचा निरोगी, सतेज होऊन त्यावरील लव कमी होते.



No comments:

Post a Comment

Bumps, Backwaters & Bliss: The Surprising Pregnancy Secret No One Tells You (Before The 'No-Sleep Era' Begins)

  Before the "No-Sleep Era" officially kicks off, why not treat yourself and your bump to a pre-baby adventure in the incredible l...